बनावट नवरदेव उभा करून लोकांना लुटणारी टोळी

श्रीरामपूर :- फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करताना पैसे कमविण्यासाठी बनावट नवरदेव उभा करून लग्न लावून लोकांना लुटणारी टोळी उघड झाली असून
यात श्रीरामपुरातील चार जणांची फसवणूक झाली आहे, यात एका मुलीचे दुसर्याशी लग्न लावून दिल्याचे आढळून आले. 10 ते 12 जणांची ही टोळी कार्यरत असून नागरिकांनी अशा प्रकारच्या टोळीपासून सावध रहावे, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी केले.
जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी काल श्रीरामपूर पोलीस स्टेशनला भेट दिली. यावेळी त्यांनी श्रीरामपूरमध्ये घडलेल्या फसवणुकीच्या प्रकरणाची माहिती पत्रकारांना दिली. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पो.नि. आयुष नोपाणी उपस्थित होते.
तालुक्यातील दत्तनगर येथील दोघींनी मालेगाव येथील एका विवाहित महिलेस केटरींगच्या कामासाठी बोलावून त्या विवाहित महिलेला चक्क इंदौर येथे 1 लाख 20 हजार रुपयांना विकल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता त्या अनुषंगाने शेखर साहेबराव खैरनार यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुरनं 29/2021 भादंवि कलम 366, 370, 371 प्रमाणे दि.14 जानेवारी 2021 रोजी गुन्हा दाखल केला होता.
सदरील गुन्ह्याचे तपास करत असताना आरोपी विरोधात भक्कम पुरावा असल्याने अनिता रवींद्र कदम (रा. दत्तनगर, श्रीरामपूर) हिस अटक केली होती. पुढील तपासात दि. 9 डिसेंबर 2020 रोजी अनिता कदम व कुंदाबाई या दोघींनी दोन मुलींना श्रीरामपूर येथून औरंगाबाद येथे नेवून तेथे सांगितले की तुमचे आम्ही लग्न लावून देतो त्या बदल्यात तुम्हाला प्रत्येकी 40 हजार रुपये देतो.
त्या पैशाचे लालसेने सदरील मुली लग्नासाठी तयार झाल्याने औरंगाबाद येथील महिला संगीता व श्रीरामपूर येथील अनिता व त्याचे साथीदार यांनी सदरील मुलींना इंदोर येथे नेवून पैसे घेवून एकीचे लग्न लावून दिले व दुसरी मुलीचेे लग्न देवीच्या मंदिरात नेवून लावले. त्यानंतर एका खाजगी वकीलाकडे घेवून जावून या मुलीचे नाव बदलून कविता चौहान ठेवून तिचा पत्ता धरमपूर इंदोर असा बनावट सांगून त्याचे नोटरी करुन दिली.
नंतर तिला चंदेरी मध्यप्रदेश येथे घेवून गेले. त्यानंतर काही दिवसांनी या मुलीने तिचे सासरच्या लोकांची नजर चूकवून श्रीरामपूर येथे पळून आली. तसेच यातील आरोपी कुंदाबाई हिने एका मुलीस अशाच प्रकारे मंगळाणी ता. नांदगाव जिण नाशिक येथे असे खोटे लग्न लावून दिले असल्याचे समोर आले आहे.
या सर्व तपासावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट यांनी सरकार तर्फे फिर्यादी होवून श्रीरामपूर शहर पो स्टे ला गुरनं 44/2021 भादंवि कलम 420, 465, 468, 471, 34 प्रमाणे अनिता रवींद्र कदम रा. दत्तनगर श्रीरामपूर, कुंदाबाई शिंदे रा. पाटाच्या कडेला, सरस्वती कॉलनी जवळ श्रीरामपूर, संगीता (पूर्ण नाव माहीत नाही) रा. औरंगाबाद, मामा (पूर्ण नाव गाव माहीती नाही), आरती (पूर्ण नाव माहीती नाही) रा. अकोला, चंदर रा. बुर्हानपूर (पूर्ण नाव गाव माहीती नाही), जिवन रा. इंदोर (पूर्ण नाव गाव माहीती नाही), सुजाता शेखर खैरनार व ज्योती सायमन ब्राम्हणे, जयश्री ठोंबरे रा. कोल्हापूर या दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सदरील गुन्ह्यातील सुजाता शेखर खैरनार, ज्योती सायमन ब्राम्हणे, जयश्री ठोंबरे यांना अटक करण्यात आली असून अनिता रवींद्र कदम हीस देखील न्यायालयीन कोठडी मधून सदरील गुन्ह्यात वर्ग करण्यात आला. यामध्ये अजुन टोळी कार्यरत आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
बाळ बोठे लवकरच गजाआड होणार
यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणी पसार असलेल्या बाळ बोठे याला लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी व्यक्त केला. या प्रकरणात पोलिसांवर कोणताही दबाव नसून निःपक्षरित्या तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रेखा जरे खून प्रकरणात बोठे हा पोलिसांना सापडत नाही. पोलीस प्रशासनात असलेल्या संबंधामुळे त्याला लाभ होतो आहे का? असा प्रश्न उपस्थित केला असता मनोज पाटील यांनी पोलिसांकडे बोठेविरोधात भक्कम असे पुरावे आहेत. त्याला निश्चितच अटक होईल असे स्पष्ट केले.