दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी बुधवार (दि. ५ ) फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले होते. या निवडणुकीत आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस (Congress) या तीन प्रमुख पक्षांत लढत झाली होती. यानंतर आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. यात भाजपने जोरदार मुसंडी मारत आघाडी घेतली होती. त्यानंतर आता दिल्ली विधानसभेचा निकाल हाती आला असून यात ‘आप’ला (AAP) मोठे धक्के बसले आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या तीन दिग्गजांपैकी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा १ हजार ८४४ मतांनी परभव झाला आहे. त्यामुळे आपला मोठा धक्का बसला आहे. तसेच आपचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांचा देखील ६०० मतांनी पराभव झाला आहे. खुद्द मनीष सिसोदिया यांनीच त्यासंदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आपण आपला पराभव मान्य करत असल्याचे ते म्हणाले आहेत.
त्यासोबतच शकुर बस्ती मतदारसंघातून आपचे उमेदवार सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांचाही पराभव झाला आहे. दुसरीकडे दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी (Atishi) या कालकाजी मतदारसंघातून (Kalkaji Constituency) विजयी झाल्या आहेत. त्यामुळे एकीकडे आपला दोन मोठे धक्के बसले असले तरी आतिशी यांच्या विजयाने (Won) त्यांना दिल्लीत काहीसा दिलासा मिळाला आहे. आतिशी यांनी भाजपच्या रमेश बिधुरी यांचा पराभव केला आहे.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या पराभवला काँग्रेसचे संदीप दीक्षित (Sandeep Dixit) कारणीभूत ठरले आहेत. कारण काँग्रेसच्या उमेदवाराने ४ हजार मते घेतली आहेत. तर केजरीवाल यांचा १ हजार ४४४ मतांनी पराभव झाला आहे. भाजपच्या परवेश वर्मांनी त्यांचा पराभव केला आहे. तसेच सध्याच्या कलांनुसार भाजप ७० जागांपैकी ४७ जागांवर आघाडीवर आहे.तर आम आदमी पक्ष २३ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे दिल्लीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल असे चित्र दिसत आहे.