भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्या लष्करी संघर्षाच्या ठिणग्या उडू लागल्या आहेत. या संघर्षाचा फटका क्रिकेटला देखील बसला असून, बीसीसीआयने (BCCI) सध्या सुरु असलेले आयपीएलचे (IPL 2025) उर्वरित सामने स्थगित (IPL suspended) करण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत बीसीसीआयने अधिकृत घोषणा केली आहे.
आयपीएलचे एकूण १६ सामने शिल्लक होते. त्यानंतर आता हे १६ सामने नंतर खेळवण्यात येणार आहेत. मात्र, हे सामने नक्की कधी खेळवण्यात येतील, याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आयपीएलमध्ये एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. २२ मार्चपासून सुरु झालेल्या आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजी कोलकात्यामधील ईडन गार्डन्स मैदानावर खेळविण्यात येणार होता. पंरतु, आता आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्यात आल्याने या स्पर्धेवर टांगती तलवार आहे.
दरम्यान, गुरुवारी धर्मशालामध्ये पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्यातील झालेला सामना भारत आणि पाकिस्तानमधील युद्धामुळे थांबवण्यात आला होता. यानंतर आता वाढत्या तणावामुळे आयपीएल (IPL) स्थगित करण्यात आल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. दुसरीकडे पाकिस्तानात झालेल्या हल्ल्यांमुळे येथे सुरु असलेल्या पीएसएलचे सामने रद्द केले होते. त्यानंतर आता पीएसएलचे उर्वरित सामने दुबईत खेळवण्यात येणार आहे.