अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
रविवारी रात्रीपासून जिल्ह्यातील सहा तालुक्यांत झालेल्या मुसळधार पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीत नागरिकांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे 227 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असल्याची माहीती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यातील कापूरवाडी, केडगाव, भिंगार, चिंचोडी, चास, श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण, कोळेगाव, कर्जत तालुक्यातील मिरजगाव, जामखेड तालुक्यातील जामखेड खर्डा, नान्नज, नायगाव, साकत, शेवगाव तालुक्यातील बोधेगाव चापडगाव, मुंगी, पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी माणिकदौंडी, टाकळी, कोरडगाव, करंजी, तिसगाव, खरवंडी, अकोला अशा 24 महसूल मंडळात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील सर्व नद्या, ओढे, नाले यांना पाणी येऊन पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याशी संपर्क साधून सर्व परिस्थिती जाणून घेतली आहे. प्रशासनाने अडकलेल्या नागरीकांच्या स्थलांतरास प्राधान्य दिले आहे. पावसाची अधिकची शक्यता लक्षात घेऊन पुणे येथून एनडीआी एफ पथक बोलावून बचाव कार्य सुरू करण्यात आले असल्याचे पालकमंत्री विखे यांनी सांगितले. पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्क राहून उपाययोजना कराव्यात. स्थलांतर करण्यात आलेल्या नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मदतीच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला असलेल्या स्थायी आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी. झालेल्या नुकसानीची अद्याप स्पष्ट आकडेवारी समोर आलेली नाही. मात्र सरसकट पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत.
227 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
जामखेड-पाथर्डी सोलापूर मार्गावरील कुशल ट्रव्हल कंपनीच्या बसमधील 70 प्रवाशांची सुटका अहिल्यानगर महापालिका आणि जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाने केली. पाथर्डी तालुक्यातील कारेगाव शिवारातील पुरात अडकलेल्या 3 आणि पिंपळेगव्हाणमधील एका व्यक्तीला तसेच खरमाटवाडीमधील 25 कोरडगावमधील 45, कोळसांगवीमधील 12 व्यक्तिंची सुटका करण्यात आली आहे. जामखेड तालुक्यातील धनेगाव येथील खैरी नदीच्या पुरात अडकलेल्या एकाच कुटंबातील 4 आणि वंजारवाडी येथे खैरी नदीच्या पाण्याचा वेढा पडल्याने 30 व्यक्तीची सुटका महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरीकांच्या मदतीने करण्यात आली. शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील 12 आखेगाव येथील 25 लोकांची सुटका करण्यात प्रशासन आणि स्थानिक नागरीकांना यश आले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
भाविकांनी काळजी घ्यावी
श्रीक्षेत्र मोहटादेवी मंदिराकडे जाणार्या भाविकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालकमंत्री विखे पाटील यांनी केले असून प्रशासनाला याभागात काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री विखे पाटील यांनी केले आहे.