श्रीरामपूर शहरातील महाविद्यालयात झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने सूतगिरणी- दिघी रस्त्यावर, रेल्वे गेटजवळच गावठी कट्ट्यातून दोघांवर दोन गोळ्या झाडल्या. त्यात एक जखमी झाला तर दुसरा बचावला. झाडलेली गोळी अॅक्टिव्हा गाडीच्या खोपडीत घुसली. यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. ही घटना काल गुरुवारी घडली.
या घटनेची फिर्यादही अल्पवयीन मुलानेच पोलिसांकडे दिली आहे. फिर्यादी मुलाची आत्या ही अंगणवाडी (भैरवनाथनगर, श्रीरामपूर) येथे तीचे नविन घर बांधत आहे. त्या घराला पाणी मारण्यासाठी फिर्यादी, त्याचा भाऊ व अन्य एक (सर्व अल्पवयीन) हे आत्याच्या नवीन घरासमोरील दिघी गावाकडे जाणार्या रस्त्यालगत थांबले होते.
फिर्यादीच्या आत्याच्या निळ्या रंगाच्या अॅक्टिवा गाडीवर दिघी रस्त्याकडे तोंड करून तिघे बसले असताना फिर्यादीच्या ओळखीचा अल्पवयीन मुलगा हा समोरुन काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आला व तो फिर्यादीच्या भावाला म्हणाला की तुच त्याचा भाऊ का? तेव्हा फिर्यादीचा भाऊ म्हणाला की हा मीच त्याचा भाऊ आहे. काही काम आहे का? तेव्हा अल्पवयीन मुलाने महाविद्यालयात झालेल्या मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करत स्वतःच्या कमरेला लपवलेली पिस्तुल बाहेर काढून फिर्यादीच्या भावाच्या पायाच्या दिशेने गोळी झाडली. पिस्तुलातील गोळी जमीनीवर आदळून फिर्यादीच्या भावाच्या पायाला लागल्याने तो जखमी झाला.
त्यामुळे फिर्यादी घाबरुन गाडीवरुन उतरुन पळाला. त्यानंतर फिर्यादीच्या दिशेने त्या अल्पवयीन मुलाने दुसरी गोळी झाडली. परंत फिर्यादीने ती गोळी हुकवली, तीच गोळी फिर्यादीच्या गाडीच्या खोपडीत घुसली. आजुबाजुच्या लोकांचा आरडाओरडा ऐकुन आरोपी अल्पवयीन मुलगा हा त्याच्या मोटरसायकलवरून रेल्वेगेट, सुतगिरणीच्या दिशेने पसार झाला. जखमी मुलास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. घटनेतील फिर्यादी व त्याचा भाऊ व साथीदारासह आरोपी असे सर्वजण अल्पवयीन आहेत.
श्रीरामपूर शहराची सुरक्षा वार्यावर
श्रीरामपूर शहरात ‘त्या’ अल्पवयीन मुलाकडे पिस्तूल आला कोठून? हा संशोधनाचा विषय आहे. शहरात गोळीबाराच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. परंतु अल्पवयीन मुलांकडून गोळीबार होणे हे प्रथमच घडले असावे, या प्रकरणाची श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांडून होत आहे.